ऊसगाळप होईपर्यंत कारखाने सुरु राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | पुढारी

ऊसगाळप होईपर्यंत कारखाने सुरु राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकर्‍यांचा ऊस गाळपाविना शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.

शेतकर्‍यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रती टन याप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यामुळे सुमारे 100 कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात 1 मे 2022 नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आतापर्यंत 32 लाख टन गाळप झाले आहे. तसेच 1 मे 2022 नंतर गाळप होणार्‍या व 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणार्‍या उसाला प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

गाळप हंगाम 2021-22 मध्ये राज्यात एकूण 13.67 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे.

Back to top button