तापमानाचा पारा वाढला! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ | पुढारी

तापमानाचा पारा वाढला! राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट'

मुंबई/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : सोमवारपासून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील दहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, मुंबई आणि ठाण्यात आर्द्रतेचे प्रमाण 90 टक्क्यांवर गेल्याने रविवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवला. ठाण्याचे तापमान 41 अंशांवर गेले होते. अकोल्यात सर्वाधिक 42 अंश तापमान नोंदवले गेले.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रात 28 ते 31 मार्च या कालावधीत हवेच्या उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. त्यामुळे कमाल तापमान सरासरी 40 ते 41 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक भागांत तापमान वाढले होते.

या जिल्ह्यांना उष्ण लाटांचा यलो अलर्ट

जळगाव (29 ते 31 मार्च), नगर (29 ते 31 मार्च), जालना (29 ते 31 मार्च), परभणी (29 ते 31 मार्च), हिंगोली (29 ते 31 मार्च) अकोला (28 ते 30 मार्च), अमरावती (28 ते 30 मार्च) वाशिम (28 ते 30 मार्च), यवतमाळ (28 ते 30 मार्च).

Back to top button