विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार | पुढारी

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार

मुंबई ; पुढारी वृतसेवा : महाविद्यालयांत विद्यार्थिनींच्या रॅगिंगचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. यामुळे कॉलेज विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम अधिक कठोर करण्यात यावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिले.

महाविद्यालयात विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी सर्व विद्यापीठे व कॉलेजांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. शैक्षणिक परिसर, वसतिगृह, ग्रंथालय, उपाहारगृहे ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षा याबाबत पुरेशा उपाययोजना करून सुरक्षितेबाबत नियमांचे कठोर पालन करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी दिले.

विधानभवनात शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. गोर्‍हे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध सूचना केल्या, तर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करण्यात येणार असून छेडछाडमुक्त, सायबर सुरक्षित परिसर ठेवण्यासाठी ही नियमावली महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. यासाठी डॉ. गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येणार असून ही समिती 90 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले.

या बैठकीला राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रॅगिंग आणि असुरक्षित वातावरणाबाबत सामंत यांच्याकडे निवेदन दिलेले एकलव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सृष्टी बाळा नांदगावकर, मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर युवा सेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे,अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button