छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात १ ते ९ एप्रिल तसेच १४ ते १७ एप्रिलदरम्यान अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसाने तब्बल २६ हजार ५१३ शेतकऱ्यांचे १० हजार ७४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश असताना प्रशासनाकडून १९ एप्रिलपर्यंत केवळ साडेआठ हजार हेक्टरवरीलच (७८ टक्के) पंचनामे पूर्ण झाले आहेत.
सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला काही वर्षांपासून अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपिटीने बेजार केले आहे. मार्च व एप्रिल या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आलेल्या या आ- पत्तीने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडवले. १ ते ९ एप्रिल या कालावधीत विभागातील सर्वच जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला, मात्र यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झाले, या अवकाळी पावसाचा २४१ गावांना फटका बसला, यामध्ये चार व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागला होता तर मोठ्या प्रमाणावर पशुधनाचीही हानीही झाली होती. आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळीचा फटका विभागातील लातूर व हिंगोली जिल्ह्यांना बसला, यामध्येही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये १ हजार ९८८ हेक्टर जिरायत, ८ हजार १० बागायती तर ७४५ हेक्टरवरील फळबागांचे असे एकूण १० हजार ७४३ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. यापैकी १९ एप्रिलपर्यंत ८ हजार ४७७ हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे करण्यात आले आहेत.
मार्च महिन्यात झालेल्या मोठ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांचा खरिपाचा घास हिरावून घेतला गेला, सरकार शेतकऱ्यांच्या झोळीमध्ये अधिकची भरपाई टाकणार असले, तरी ही रक्कम मिळणार कधी? हा प्रश्न आहे. यानंतर एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे नुकसान झाले, एकामागोमाग आलेल्या आपत्तीचे पंचनामे करून शासनदरबारी पाठवण्यात येत असले, तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी निधी मिळणार कधी, हा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रकरणांतील तब्बल दीड हजार कोटी शासनदरबारी थकीत आहे.