

Farmers hope to make up for Kharif losses in Rabi season
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्पासह इतर साठवण तलाव व रेणा नदीवरील बॅरेजेसमध्ये यावर्षी मुबलक जलसाठा झाल्याने विहिरी व बोअरच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरवर्षी रब्बीच्या पेरण्या शक्यतो ऑक्टोबर महिन्यात सुरू होतात. मात्र या वर्षी त्या किमान पंधरा ते वीस दिवसांनी लांबण्याची शक्यता आहे.
२०२१ च्या तुलनेत यंदा रेणापूर तालुक्यात अधिक पाऊस झाल्याने रेणा मध्यम प्रकल्प, व्हटी प्रकल्प व नदी नाले भरून वाहिले आहेत. शिवाय तालुक्यातील नऊ साठवण तलाव, रेणा नदीवरील तीन बॅरेजेस, केटीवेअर, ३५ पाझर तलाव तसेच साडेतीनशेच्या वर शेततळीही पाण्याने तुडुंब भरले आहेत. यासोबतच विहिरी विद्युतपंप, बोअर व हातपंपाच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. संपुर्ण तालुका जलमय झाल्यामुळे प्रशासनावर टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा ताण येणार नाही. तसेच विहिरी बोअर विद्युतपंप अधिग्रहण करावे लागणार नाहीत.
खरिपामध्ये २५ वर्षांपासून सोयाबीन हेच मुख्य पीक घेतले जाते. निसर्गाच्या अवकृपेने २००० पासून खरिपाच्या पेरण्या वेळेवर होत नाहीत. सध्या उरले सुरले सोयाबीन काढण्या वेगात सुरू आहेत. अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला परंतु रब्बी पिकासाठी हा पाऊस समाधानकारक झाल्याने यावर्षी २७ ते २८ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात ज्वारीचे दर दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल राहिले. त्यामुळे या वर्षी ज्वारीचा पेरा वाढण्याची शक्यता नाही.
त्यात गहू पिकामध्ये वाढ होईल. रेणापूर महसूल मंडळात ८ ते ९ हजार हेक्टर, पानगाव महसूल मंडळात ५ ते६ हजार हेक्टर, पळशी महसूल मंडळात -४ ते साडेचार हजार हेक्टर, कारेपूर महसूल मंडळात -४ ते सव्वाचार हजार हेक्टर तर पोहरेगाव महसूल मंडळात ३ ते साडेतीन हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याची शक्यता आहे. बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढल्याने तेलवर्गीय करडीची पेरणी वाढेल.
मागील काही वर्षांपूर्वी तालुक्यात अवर्षणस्थित परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र कमी झाले होते. परंतु मांजरा परिवारातील रेणा सहकारी साखर कारखान्यासह सर्वच कारखान्यांनी ऊसाला चांगला भाव दिल्याने व चांगला पाऊस झाल्यामुळे शिवाय बॅरेजेसही भरल्यामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.