वडीगोद्री,पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे आंदोलनस्थळी जाणारे दोन्हा पर्यायी मार्ग बंद झाले होते. हे मार्ग बंद झाल्याने लोकांना जाण्याऐण्यासाठी वडीगोद्रीतील मुख्य रस्ता सुरू होताच ओबीसी-मराठा आंदोलक पुन्हा आमने-सामने घोषणाबाजी करत आल्याने काही वेळ तणावपुर्ण परिस्थिती झाली होती. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण मिळवत वातावरण शांत केले आहे.
मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन दोन किलोमीटर सुरू आहे. शनिवारी (दि.21) दोन समाजामधील आंदोलक एकमेकांसमोर आल्याने घोषणाबाजी आणि वादविवाद होवून दिवसभर खूप तणावाचे वातावरण झाले होते. पोलिसांनी सतर्कता म्हणून कालपासून बंदोबस्त वाढवला होता. याबरोबरच अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले होते. अंतरवाली सराटीकडे ये-जा करण्यासाठी दोन पर्याय रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली होती. कालपासून वडीगोद्री चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी सतर्क पाहायला मिळत आहे.