वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: धुळे- सोलापूर महामार्गावर गाड्या अडवून मराठा समाजाकडून अचानक रास्ता रोको आंदोलन आज (दि. २४) करण्यात आले. मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Maratha Reservation Protest)
जरांगे यांच्या तब्बेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या हजारो मराठा बांधवांचा जथा धुळे - सोलापूर महामार्गावर उतरला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास महामार्ग ठप्प झाला. परिणामी हजारो वाहने रस्त्यावर उभी होती. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान पाऊस आल्याने आंदोलकांनी ठिय्या सोडला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (Maratha Reservation Protest)
तर दुसरीकडे जालना राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्ता रोखला. एक तास मराठा आंदोलकांनी या मार्गावर आंदोलन केले.
जरांगे पाटील यांची तब्बेत खालावत चालल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र, सरकार मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे आक्रमक होऊन मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सरकारने मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.