

Incidence of bokdya disease on chilli
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: भोकरदन तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मिरचीवर बोकड्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने क्वालिटी घसरली आहे. यामुळे मिरची उत्पादक हवालदिल झाला आहे.
भोकरदन तालुका शेती उत्पादक म्हणून ओळखल्या जातो. मात्र, मागील काही वर्षांत शेती करणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मिरचीची लागवड करायला सुरुवात केली आहे. मात्र, यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
त्यामुळे मिरचीची क्वालिटी घसरली असून तिचा दरही कमी झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी वातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली आहे. मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्याने स्थितीत मिरची नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांनी मिरची पीक उपटून फेकले आहे.
पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळे मिरची लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही. परिणामी, दिल्ली आणि बंगळुरुला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मागील वर्षात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पन्न व भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा मिरचीकडे वळवला आहे. या उन्हाळी मिरचीला अगोदरच उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. त्यामुळे काही प्रमाणात मिरचीची रोपे जळून गेली होती. आता कोकडा पडला. यामुळे सततच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी कुठल्यान कुठल्या कारणाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे, मिरचीसाठी रोप, खत, ठिबक, मल्चिंग आणि मजूर असा लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मिरची पीक चांगलेच बहरले होते; परंतु त्यावर वातावरणाच्या बदलामुळे कोकडा रोग पडला होता.