कन्नड : ग्रामीण भागातील लग्नाळू तरूणांना लग्नासाठी मुलगी बघून द्यायची, लग्न लावायचे व त्याबदल्यात त्या तरुणाच्या कुटुंबियांकडून भली मोठी रक्कम स्वीकारायची, अशी बोगस लग्न लावणारी टोळी शहरात सक्रीय होती. या टोळीतील दोन दलालांना कन्नड शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.२७) अटक केली.
पैसे देवून लग्नासाठी मुलगी शोधली. देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने विवाहसुद्धा झाले. मात्र कोर्ट मॅरेज करायचे आहे त्यासाठी आधार कार्ड आणि इतर कागदपत्र घेवून येते, असे विवाहानंतर तीन-चार दिवसांनी नववधू सांगून निघुन गेली, मात्र पुन्हा ती परतलीच नाही. तिचा शोध घेतला मात्र घराला कुलूप असल्याचे दिसून आले. या बोगस विवाहाच्या निमित्ताने आपली २ लाखाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहरातील तरुणाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी, लग्नासाठी विठ्ठल किसन पवार व ज्ञानेश्वर दाभाडे यांनी मला मुलगी शोधून देवून त्याचे नातेवाईक असलेल्या लोकांशी ओळख करुन दिली. त्यानंतर विठ्ठल पवार यांनी लग्नासाठी शोधून दिलेल्या मुलीच्या मोबदल्यात २० हजार रुपये घेतले. व लग्नासाठी शोधून दिलेल्या मुलीचे आई-वडील हे कोरोना काळात मयत झाल्याने त्यांच्यावर झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी मुलीची मावसबहीण पुजा फतपुरे हिने रोख दीड लाख रुपये घेतले व मुलीस लग्नात २६ हजाराचे सोन्याची दागिने करुन घेतले. त्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर बोगस लग्न झाल्यानंतर बनावट नवरीही चार दिवसानंतर कपाटातील १५ हजाराची रक्कम घेऊन पसार झाली. लग्नाचा बनाव करुन लग्नासाठी २ लाखाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तक्रारदार याने पाच जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.