

गौतम बचुटे
केज : मागाली आठ दिवसांपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने कोरडेवाडी येथे राजश्री उमरे पाटील या उपोषणाला बसल्या आहेत. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार नुकसान भरपाई देण्यात यावी, ज्ञानाराधा मधील ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात याव्यात आणि कोरडेवाडीच्या नियोजित साठवण तलावाला पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह इत्तर मागण्यासाठी उपोषण सुरू आहे.
उपोषणाला आठ दिवस उलटून गेले आहेत. आज उपोषणाचा नववा दिवस सुरू झालेला आहे. मात्र त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आज (दि. ११ ऑक्टो) धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे जलसमाधी घेणार आहेत. तसेच तीन दिवसापूर्वी राजश्रीताई उमरे पाटील यांच्या समर्थनासाठी आंदोलकांनी केज तहसीलच्या आवारात बैलगाडीला आग लावली होती. त्यामुळे आता आजच्या जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.
या बाबतची माहिती अशी की, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री उमरे पाटील यांचे मागील आठ दिवसापासून कोरडेवाडी तालुका केज येथे उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा नववा दिवस सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, तरी देखील सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आता गावकरी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वा. केज तालुक्यातील टोकावाडी आणि कोरडेवाडी या दरम्यानच्या तलावात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
उपोषणकर्त्या राजश्रीउमरे पाटील यांनी सरकारकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये कोरडेवाडी येथील साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रु. सरसकट अर्थिक मदत करण्यात यावी. ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण व थकीत रक्कम परत देण्यात यावी. ज्ञानराधा बँकेची स्थावर व जंगम मालमत्ता शासनाच्या ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करून त्यातून मिळालेल उत्पन्नातून ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्यात यावेत. शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. शैक्षिणिक फी माफ करण्यात यावी.
राजश्री उमरे पाटील यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालया समोर बैलगाडी पेटवून दिली होती. त्यामुळे आता उद्याच्या जलसमाधी घेण्याच्या इशाऱ्यामुळे प्रशासन दक्षता घेत आहे. जलसमाधी आंदोलना दरम्यान काही अघटीत घटना घडू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.