वैजापूर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या गायगोठ्याचे देयक काढण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी वैजापूर पंचायत समितीचे संवदगाव येथील रोजगार सेवकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (दि.८) सवंदगाव येथे केली.
दरम्यान, पंचयात समितीच्या 'मराग्रारोहयो' विभागातील अभियंता वैभव गुडदे याच्या सांगण्यावरून आपण लाच स्वीकारल्याचे रोजगार सेवकाने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियंता वैभव रावसाहेब गुडदे (रा.वक्ती पानवी) व रोजगार सेवक जितेंद्र कोंडाजी कदम (रा.सवंदगाव)असे या दोघा लाचखोरांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सवंदगाव येथील शेतकऱ्यास महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गंत गायगोठा मंजूर झाला आहे. या गोठ्यासाठी त्यांना १ लाख २२ हजार रुपये मंजूर झाले आहे. गायगोठयाचे बहुतांश काम झाल्याने काही प्रमाणात देयक निघणार होते. पंचायत समितीचा अभियंता वैभव गुडदे व रोजगारसेवक जितेंद्र कदम या दोघांनी शेतात जाऊन गोठ्याची पाहणी केली. परंतु, देयक काढण्यासाठी त्या दोघांनी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे शेतकऱ्याने मान्य केले.
त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. त्या आधारे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पथकाने सापळा रचून रोजगारसेवक जितेंद्र कदम याला आठ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक दीपाली निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा