बीड: हळद सुकण्याआधीच नापसंत पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून | पुढारी

बीड: हळद सुकण्याआधीच नापसंत पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : बावीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पतीचा पत्नीने झोपेत गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.७) निपाणीजवळका तांडा येथे घडली. या प्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निलाबाई राजाभाऊ चव्हाण (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22, रा. निपाणीजवळका तांडा) याचे व शीतल (रा. पौळाची वाडी ता. जि. बीड) हिचाशी 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे थाटामाटात लग्न झाले होते. त्यानंतर नवरदेव मुलगा मला आवडत नाही, असे म्हणून शीतल पांडुरंगसोबत सतत भांडण करत असे. 7 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे नवदाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपले होते. काही वेळाने शीतल बेडरुम बाहेर आली.  पांडुरंग बेशुद्ध झाल्याचे सासू-सासर्‍याला सांगितले. त्यानंतर पांडुरंगला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

सुनेनेच आमच्या मुलाला मारले आहे, असा संशय शीतलच्या सासु-सासर्‍याने व्यक्त केला होता. या प्रकरणी शीतलविरोधात पांडुरंग यांची आई निलाबाई राजाभाऊ चव्हाण (वय 45) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत ६ दिवसानंतर गुन्हा दाखल करून शीतलला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button