औरंगाबाद : नाथसागर धरणाचे १० दरवाजे बंद ; गोदावरीत ५ हजार ७८१ क्युसेक विसर्ग सुरु | पुढारी

औरंगाबाद : नाथसागर धरणाचे १० दरवाजे बंद ; गोदावरीत ५ हजार ७८१ क्युसेक विसर्ग सुरु

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून मोठ्या प्रमाणावर येणारी पाण्याची आवक आज (दि.१) दुपारी कमी झाली. त्यामुळे धरणाचे उघडण्यात आलेल्या १८ दरवाजापैकी १० दरवाजे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला. आता नाथसागर धरणातून गोदावरी नदीत ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दि. २५ जुलैरोजी नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर येत होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढल्याने धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात येऊन गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु आज दुपारी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी गोदावरी नदीतील विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १८ दरवाजापैकी १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२ व २५ या क्रमांकाचे १० दरवाजे बंद करण्यात आले. आता नदीपात्रात ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button