कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग शेतकर्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही, तो कोणावरही लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ रस्त्याला मान्यता देणे. खर्चासाठी बारा हजार कोटी निधी उभारणीला मान्यता देणे, त्यासाठी कर्ज उभारणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी संपादनाची रद्द केलेली कारवाई पुन्हा सुरू करणे असे तीन विषय मंत्रिमंडळ बैठकीत होते. पहिले दोन विषय मंजूर झाले. तिसर्या विषयाबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आपण मुख्यमंत्र्यासमोर भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यातील शेतकरी अल्पभूधारक आहेत, ते फार जिद्दीने शेती करतात. जिल्ह्यातील क्षेत्र बागायती आहे आणि या जमिनी शेतकर्यांचे काळीज आहे. त्यामुळे या जमिनी सहजासहजी द्यायला त्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील संपादनाची अधिसूचना रद्द करण्यासाठी त्यावेळी आपण सर्वांनी सहकार्य केले होते.
शक्तिपीठ महामार्गाचा परिणाम लोकसभा निवडणुकीला झाला होता. ही अधिसूचना रद्द केली नसती तर विधानसभेलाही त्याचे दुष्परिणाम होणार होते हे त्यावेळी आपण सांगितले होते, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला असाच विरोध होत होता. बाजारभावापेक्षा चार-पाच पटीने मोबदला दिल्यामुळे शेतकरी तयार झाले आणि आज तो रस्ता झाल्यानंतर तिथली समृद्धी बघा. त्यामुळेच जमिनीच्या किमती वाढत आहेत. रस्त्याला पेट्रोल पंप व इतर अनुषंगिक सोयी- सुविधा वाढत आहेत. तसेच, बेरोजगारांनाही काम मिळत असल्याचे सांगितले. दोन महिन्यांपूर्वी पन्हाळगडावरील कार्यक्रमासाठी आलो असता विमानतळावर चार-पाचशे शेतकरी येऊन भेटले. चांगला मोबदला मिळणार असेल तर जमिनी देण्यासाठी तयार आहोत, असे निवेदन देतानाच आमच्या सह्या आणि सातबारा तपासा असेही म्हटले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय व शेतकर्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असेही सांगितले होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
विरोधक विरोध करणारच, त्यांचे ते कामच आहे. परंतु; शक्तीपीठ आम्ही करणारच. परंतु; तो कोणावरही लादणारही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रस्त्याबाबत तीन- चार पर्याय आहेत. आम्हाला ज्यावेळी बोलावून घेतील, त्यावेळी पर्याय सांगतील. जिथे- जिथे विरोध असेल तिथे- तिथे ती लाईन बदलून कशी घ्यायची हा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार यांनी पॅनेल उभे करून अजित पवार यांना मदत केली अशी चर्चा आहे, याबाबत विचारता मंत्री मुश्रीफ म्हणाले याउलट शरद पवार यांचे पॅनेल नसते तर अजित पवार यांची मते आणखी वाढली असती.