Shivshastra Shaurya Gatha | शिवरायांचा पराक्रम, शौर्याची ओळख करून देण्याचा उद्देश : जिल्हाधिकारी

शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन नियोजनाचा घेतला आढावा
Shivshastra Shaurya Gatha
कसबा बावडा : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. सोबत कार्तिकेयन एस., संजय तेली, तानाजी सावंत, उत्तम कांबळे, मीना शेंडकर आदी.
Published on
Updated on

कसबा बावडा : येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ हे ऐतिहासिक प्रदर्शन पाहण्यासाठी बुधवारपासून खुले झाले. पुढील काळात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रदर्शनाला दोन दिवसांत पाच हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रदर्शनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सुधारणा व सुविधांबाबत सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, पुरातत्त्व विभागाचे समन्वयक उत्तम कांबळे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, आठ महिने हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व, निबंधलेखन, अनुभव लेखन या स्पर्धांचा समावेश असेल. या माध्यमातून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि ऐतिहासिक वारसा यांची ओळख करून देणे हा उद्देश आहे.

विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ‘माझा अनुभव’ या स्वरूपात लेखन सादर करायचे आहे. तसेच, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलेल्या बाराही किल्ल्यांच्या अनुषंगाने निबंधही लिहायचे आहेत. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. याशिवाय, शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले. नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता राखणे, तसेच वृद्ध आणि लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करणे याबाबत संबंधित विभागांना जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश दिले. त्यांनी पुरातत्त्व खात्याला शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शन स्थळाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचनाही केल्या.

शिक्षण विभागाला जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना समाविष्ट करून दररोज नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखविण्याच्या सूचना केल्या. एकाच दिवशी गर्दी टाळण्यासाठी शाळांना स्वतंत्र तारखा देण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन केवळ इतिहासाचे पुनरुज्जीवन नाही, तर तो अभिमानाने पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा एक लोकोत्सव आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे येडगे यांनी सांगितले.

प्रदर्शन रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5.30

प्रदर्शन रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहील. दर सोमवारी प्रदर्शन बंद राहणार आहे. सुरक्षा आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण लक्षात घेऊन नागरिकांना प्रदर्शनस्थळी कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news