

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा
दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा दत्तवाड एकसंबा बंधारा चालू वर्षी चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतराने प्रवास करावा लागणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप देऊन पडलेले ऊन पाहता चालू वर्षाचा पावसाळा संपला अशी मानसिकता नागरिकांची बनली होती, मात्र ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या संततदार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी वाढले असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे पाणी वाढल्याने दत्तवाड एकसंबा बंधारा चालू पावसाळ्यात चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
सप्टेंबरच्या मध्यापासून पंधरा ते वीस दिवस पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतल्याने दूधगंगा नदीचे पाणी पूर्णपणे पात्रात गेले होते. मार्च-एप्रिल मध्ये असणाऱ्या उन्हाप्रमाणे सप्टेंबर मध्ये ही उन्हाळा जाणवत होता. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली पाण्याची विद्युत मोटारी पुन्हा जोडू लागले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे या विद्युत मोटारी पुन्हा सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे उभ्या पिकांच्या सऱ्यामध्ये पाणी थांबले आहे. त्यामुळे मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. आणखी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास नोव्हेंबर मध्ये सुरू होणारा गळीत हंगाम पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कारखानदारांबरोबर शेतकरी ही चिंताग्रस्त झाला आहे.