कोल्हापूर : ‘अमृत’ योजना बनलीय ‘विषारी’ | पुढारी

कोल्हापूर : ‘अमृत’ योजना बनलीय ‘विषारी’

कोल्हापूर; सतीश सरीकर : बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांत निधी नाही म्हणून विकासकामे रखडतात. परंतु कोल्हापूर महापालिकेत उलटी स्थिती आहे. निधी पडून असला तरीही कामे होत नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या तिजोरीत गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत ( कोल्हापूर अमृत योजना ) शहरात जलवाहिन्यासह इतर कामांसाठी तब्बल 115 कोटींचा निधी पडून आहे. परंतु ठेकेदारावर प्रशासनाने नियंत्रण नसल्याने अवघे शहर खड्डेमय झाले आहे. मुदत संपून सव्वा वर्ष उलटले तरी केवळ 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. संपूर्ण शहरात झालेल्या खोदाईमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून शहरवासीयांना घशाचे त्रास होत आहेत.

परिणामी कास वगतीच्या कामामुळे ‘अमृत’ योजना ( कोल्हापूर अमृत योजना ) कोल्हापूरवासीयांसाठी ‘विषारी’ बनत आहे. योजनेसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची आहे. सुपरव्हिजन आणि बिले करण्याचे काम या अधिकार्‍याकडे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी ‘बिल’ करण्याशिवाय योजनेच्या कामाकडे बघतही नसल्याचे वास्तव आहे.

कोल्हापूर शहरांतर्गत मुख्य वितरण नलिका व अंतर्गत वितरण नलिका बदलण्याचे तसेच उपनगरांत नव्या वितरण नलिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. एकूण 114 कोटी 81 लाखांची योजना आहे. योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे जाळे विणले जाणार आहे. जुनाट जलवाहिन्या बदलून शहरात तब्बल 430 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे. थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यानंतर अमृत योजनेतील जलवाहिन्यांमुळे शहरवासीयांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. परंतु आतापर्यंत 430 किलोमीटर जलवाहिन्यांपैकी फक्त 200 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. लाखो लिटरचे तीन संप बांधण्याचे प्रस्ताव असून अद्याप त्याची कामेही अपूर्ण आहेत. शहरात ठिकठिकाणी लाखो लिटर पाण्याच्या उंच टाक्या बांधणे प्रस्तावित आहे. तीन वर्षे झाली तरी एकाही टाकीचे काम ठेकेदार कंपनी पूर्ण करू शकलेली नाही.

योजनेचे काम मोठे असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी सांगलीतील ठेकेदार कंपनीला ठेका देण्यात आला. परंतु ठेकेदार कंपनीने कामासाठी तब्बल 22 उपठेकेदार नेमले आहेत. त्यामुळे कुणालाच कुणाचा थांगपत्ता नाही. अनेक ठेकेदार कामे अर्धवट टाकून पळून गेले आहेत. परिणामी निधी असूनही योजना गटांगळ्या खात आहे. योजना कधी पूर्ण होईल हे ठेकेदार कंपनी आणि महापालिकेचे अधिकारीही सांगू शकत नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकार्‍यांकडे सुपरव्हिजन व इतर कामे आहेत. परंतु त्या अधिकार्‍यांना तर योजना झाली काय किंवा नाही झाली काय, त्याचे काहीही देणे-घेणे नाही. योजनेच्या कामाकडे ते फिरकतही नाहीत.

कोल्हापुरात धुळीचे अन् खड्ड्यांचे साम—ाज्य… ( कोल्हापूर अमृत योजना )

अमृत योजनेंतर्गत कोल्हापूर शहरात जलवाहिन्यांचे जाळे विणले जाणार आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणात खोदाई होणार हे स्पष्ट आहे. विकास पाहिजे म्हणजे थोडाफार त्रास होणार, म्हणून शहरवासीयांनीही मानसिकता केली होती. परंतु ठेकेदार कंपनीच्या वतीने जलवाहिन्यांसाठी खोदाई केल्यानंतर कधीच तत्काळ मुजविण्यात येत नाही. अनेक भागात तर नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरही खोदाई करण्यात आली आहे. बहुतांश रस्त्यावर खोदाई केलेले रस्ते तसेच आहेत. परिणामी शहरात धुळीचे आणि खड्ड्यांचे साम—ाज्य निर्माण झाले आहे. परिणामी वाहनांची कोंडी नित्याचीच बनली आहे. खोदाई केलेल्या ठिकाणाहून नागरिकांना चालणेही मुश्किलीचे बनले आहे. अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

महापालिका हिश्श्यापोटी तीन मार्केट तारण… ( कोल्हापूर अमृत योजना )

केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून कोल्हापूर शहरासाठी 115 कोटींची योजना मंजूर झाली आहे. यात केंद्र शासन 50 टक्के, राज्य शासन 25 टक्के व महापालिका 25 टक्के असा हिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने प्रशासनाने आपल्या हिश्श्यापोटीच्या रकमेसाठी छत्रपती शिवाजी मार्केट, छत्रपती शाहू मार्केट व कपिलतीर्थ मार्केट तारण ठेवली आहेत. त्याद्वारे 25 टक्के हिश्श्याच्या रकमेची तजबीज केली आहे. योजनेच्या मंजुरीनंतर केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्श्याचा निधी महापालिकेकडे वर्ग झाला आहे.

  • योजनेची किंमत : 115 कोटी
  • वर्कऑर्डर : 1-9-2018
  • कामाची मुदत : 31-8-2020

430 किलोमीटर जलवाहिन्या

प्रस्तावित पंप

  • सुभाषनगर 10.75 लाख लि.
  • कसबा बावडा 24 लाख लि.
  • राजेंद्रनगर 3.40 लाख लि.

प्रस्तावित पाण्याच्या उंच टाक्या

कदमवाडी              17 लाख लि.
सम—ाटनगर      13.50 लाख लि.
ताराबाई पार्क     16.10 लाख लि.
राजेंद्रनगर                9 लाख लि.
बोंद्रेनगर            13.50 लाख लि.
पुईखडी                  20 लाख लि.
शिवाजी पार्क             8 लाख लि.
बावडा रॉ वॉटर           7 लाख लि.
कसबा बावडा           10 लाख लि.
सायबर चौक            18 लाख लि.
लकी बझार          10.10 लाख लि.
आपटेनगर           18.30 लाख लि.

Back to top button