
लातूर, पुढारी वृतसेवा : हरवलेल्या महिलेच्या शोधात आलेल्या कोल्हापूर येथील दोघांना लातूरात चोर समजून जमावाने मंगळवारी (दि.२३) बेदम मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळू इटकर, बबलू कैकाडी व राहुल काळुंके अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर यथील उचगाव पूर्व येथील रहिवाशी महादेव अनंत काळे यांची पत्नी सुनिता ही हरवली आहे. याबाबत महादेवने कोल्हापूर येथील पोलिस ठाण्यात फिर्यादही दिली होती. दरम्यान, त्याची पत्नी लातूर येथील वसवाडी भागात असल्याचा निनावी फोन महादेवला आला व त्याने त्याचा पुतण्या आकाश राजू काळे याला घेऊन लातूर गाठले. तिथे त्याने एका पानटपरी चालकाला पत्ता विचारला व पानटपरी चालकास ते चोर असल्याचा संशय आला. त्यांची भाषाही वेगळी वाटल्याने त्याने तेथील शेजाऱ्यांना हाक मारुन बोलावले व सर्वांनी त्यांना बदडायला सुरुवात केली.
सर्वजण मारत असल्याने या चुलत्या पुतण्याने पळ काढत एका शटरमध्ये स्वत:ला कोंडले. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलिसांना कोणतरी फोन करुन याची माहिती दिली. पोलीस तत्काळ तिथे पोहोचले व त्यांनी त्यांची सुटका केली. दोघांनाही ठाण्यात आल्यानंतर त्या दोघांच्या येण्यामागचे कारण कळले व ते चोर नसल्याचे लक्षात आले.
लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोर येत असल्याची अफवा उठली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अफवा पसरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली, असली तरी लोकांच्या मनात संशय व भीती कायम आहे. याच कारणामुळे हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा शहरात आहे.
हेही वाचा