ललित गांधी यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ऍग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी निवड | पुढारी

ललित गांधी यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ऍग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन गेल्या 95 वर्षापासुन कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ऍग्रीकल्चर’ च्या अध्यक्षपदी ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या द्वीवार्षिक निवडणुकीची प्रक्रीया सुरू असुन 9 व 10 नोव्हेंबर च्या छाननी प्रकियेनंतर 11 नोव्हेंबर रोजी निवडणुक अधिकारी सागर नागरे यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. अध्यक्ष पदासाठी राज्यातुन एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे ललित गांधी यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.

निवडणूक प्रक्रियेस जाण्यापूर्वी ललित गांधी यांनी दैनिक पुढारी चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. प्रतापसिंह जाधव यांनी ललित गांधींच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र चेंबर च्या व्यवस्थापन समितिच्या सहा जागा व गव्हर्निंग काऊन्सील च्या 92 जागांसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू असुन, ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील दोन उपाध्यक्ष व गव्हर्निंग काऊन्सील वरील 27 सदस्य बिनविरोध निवडुन आले असुन व्यवस्थापन समितिच्या उर्वरीत तीन जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात असुन, गव्हर्निंग काऊन्सील च्या उर्वरीत 62 जागांसाठी 117 उमेदवार रिंगणात आहेत.
15 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असुन या तारखेनंतर उर्वरीत जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

स्वातंत्र्यपुर्व काळात भारतीय उद्योजकांसाठी ब्रिटीशांशी संघर्ष करणारे व भारताची पहिली स्वदेशी मोटार, पहिले स्वदेशी जहाज व पहिले स्वदेशी विमान निर्माण करणारे दृष्टे उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात येण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी 1927 साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर ची स्थापना केली वालचंद हिराचंद यांनी त्यांचे सहकारी आबासाहेब गरवारे, शंतनुराव किर्लोस्कर, बाबासाहेब डहाणुकर यांच्या सोबतीने महाराष्ट्रभर दौरे करून महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया रचला.

औद्योगिक सहकारी वसाहतींची स्थापना, अनेक नवीन रेल्वे सेवा, विमान सेवा यांच्या सुरूवातीबरोबरच राज्यातील जकात रद्द करणे, विविध कर सुधारणा, उद्योग धोरणातील सुधारणा, निर्यातवृध्दीसाठी प्रोत्साहन योजना यासाठी चेंबरने यशस्वी कार्य केले आहे.

राज्यातील 550 हुन अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजार हुन अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न असुन, 550 संलग्न सभासदांच्या माध्यमातुन चेंबर राज्यातील 7 लाख व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करीत आहे.

ललित गांधी गेल्या 21 वर्षापासुन महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असुन गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले असुन विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, शतकमहोत्सवाकडेे वाटचाल करणार्‍या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही दुर्मिळ व महत्वपुर्ण घटना असुन महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषि पुरक उद्योग व पायाभुत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहु छोट्यात छोट्या व्यापारी – उद्योजकांचे प्रश्‍नही प्राधान्याने हाती घेऊ तसेच महाराष्ट्राला संपुर्ण देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या बरोबर कार्य करून यश मिळवु असे सांगितले.

Back to top button