

मधुकर भोसले
हमीदवाडा : अखेर पूर्ववत चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. अगदी यावर्षीपासूनच ही परीक्षा या वर्गांसाठी घेतली जाणार आहे. याची घोषणा करणारा आदेश 17 ऑक्टोबर रोजी काढला; पण या परीक्षांचा अभ्यासक्रमच अद्याप उपलब्ध न झाल्याने व एक सत्र संपल्याने परीक्षेस बसणार्या मुलांना काय व कधी शिकवायचे, असा पेच शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
पूर्वीपासून चौथी व सातवीलाच शिष्यवृत्ती परीक्षा होती; मात्र 2016 पासून या वर्गांना ती परीक्षा बंद करून ती पाचवी व आठवीला सुरू केली. पण, आता खर्या अर्थाने प्राथमिक शिक्षणाचे मूल्यमापन व्हायचे असेल, तर पूर्ववत चौथी व सातवीलाच शिष्यवृत्ती हवी, अशी जोरदार मागणी विचारात घेऊन शासनाने त्यास मान्यता देऊन तसा आदेशदेखील काढला; पण यामुळे यावर्षीपुरती चौथी, पाचवी, सातवी व आठवी या चार वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागत आहे.
यातील जुन्या नियमाप्रमाणे पाचवी व आठवीचे मार्गदर्शन शाळेच्या या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाले; पण आता ऐनवेळी जाहीर केलेल्या चौथी व सातवी शिष्यवृत्तीसाठी यंदा नव्याने अभ्यासक्रम तयार करावा लागणार आहे. या निर्णयाची घोषणा झाली; मात्र हा अभ्यासक्रमच अजून तयार नाही, अशी बिकट अवस्था आहे. पहिली ते चौथीच्या नियमित पाठ्यपुस्तकांतून चौथी शिष्यवृत्तीचा व पहिली ते सातवीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित सातवी शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपातील प्रत्येकी दीडशे गुणांचे हे दोन पेपर असतील. हा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या संस्थेकडे आहे. चौथी व सातवीची परीक्षा एप्रिल किंवा मे 2026 मध्ये जरी होणार असली, तरी एक सत्र संपले आहे. शिष्यवृत्तीची तयारी 1 जूनपासून सुरू करतात; पण आता तर अभ्यासक्रमच तयार नाही तर शिकवायचे काय, हा प्रश्न आहे.
अडीच महिने जादा; पण पाच महिने वाया..
या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासूनच नेमकी शिष्यवृत्ती कितवीला? हा संभ—म होता. याबाबत निर्णय हा जूनमध्येच अपेक्षित होता; मात्र प्रशासकीय व राजकीय पातळीवर प्राधान्यक्रमावर हा विषय नसावा म्हणून तर अर्धे शैक्षणिक वर्ष झाल्यावर ही घोषणा केली आहे. जरी परीक्षेसाठी नियमित वेळेपेक्षा दोन-अडीच महिने जादा मिळणार असले, तरीही आतापर्यंत पाच महिने वाया गेले व अजून अभ्यासक्रमदेखील नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून यावर्षी या परीक्षेला विरोध होत आहे. या सार्यात संबंधित विद्यार्थी व शिक्षक यांची मात्र कोंडी होत आहे.