कोल्हापूर : निष्ठावंतांना कात्रजचा घाट..! | पुढारी

कोल्हापूर : निष्ठावंतांना कात्रजचा घाट..!

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : उमेदवारीसाठी गठ्ठा मतदान अन् खर्च करण्याची तयारी, हा निकष प्रभावी ठरल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक निष्ठावंतांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे. या नाराजीतूनच सामान्य कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्याने गावागावांतील नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे नाराजी दूर करून माघारीसाठी नेत्यांना अक्षरश: हातपाया पडण्याची वेळ आली आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा ते संसदेपर्यंत मजल मारलेल्या जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांची सुरुवात ग्रामपंचायतीच्या राजकारणापासूनच झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व असते. राजकीय करिअरमध्ये सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायत चांगला प्लॅटफॉर्म आहे. विशेषत:, युवकवर्ग या निवडणुकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो. भविष्यातील राजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळेल, या अपेक्षेने गटासाठी पडेल ती जबाबदारी एकनिष्ठपणे सांभाळत चप्पल तुटेपर्यंत नेत्याच्या निवडणुकीत पळत असतो. मात्र, ऐन निवडणुकीत उमेदवारी देताना एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे नाव गायब होते.

काही गावांत विशेष मर्जीतील; पण हो ला हो म्हणणार्‍यांना उमेदवारी देण्यासाठी, तर याला कोण ओळखतंय, असे वातावरण करून निष्ठावंतांचे पंख छाटण्यात आल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयाला मिळत आहे.

ग्रामपंचायती 474; उमेदवारी अर्ज 19,393

जिल्ह्यात सध्या 474 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. सरपंचपदासाठी 2,702; तर सदस्यपदासाठी 16,691 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही आकडेवारी पाहता उमेदवारी डावलल्याच्या रागातून उच्चांकी अर्ज दाखल झाल्याचे दिसते. यामध्ये युवकांची संख्य उल्लेखनीय आहे.

माघारीसाठी पै-पाहुणे आणि दबावतंत्रही

नेत्यांनी लावलेल्या जाती, आर्थिक निकषास पात्र ठरत नसल्याची खात्री झाल्याने अनेक युवक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काहीही होवो निवडणूक लढवायचीच, ताकद आजमावण्याचा निर्धार या निवडणुकीच्या माध्यमातून गावागावांत होत आहे. पै-पाहुणे, नातेवाईक, मित्र यांच्यामार्फत अर्ज माघारीसाठी लकडा लावणे सुरू आहे. काही गावांत तर माघारीसाठी दबावतंत्राचाही वापर सुरू झाला आहे. बुधवारी माघारीचा शेवटच्या दिवसापर्यंत निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यात नेत्यांना कितपत यश आणि कार्यकर्ते नेत्यांना किती दाद देतात, यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button