हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोमय्यांची ‘ईडी’कडे तक्रार | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोमय्यांची ‘ईडी’कडे तक्रार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लाँडरिंग आणि बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात दाखल केली. या प्रकरणी ते बुधवारी दिल्लीत ईडी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तसेच कंपनी मंत्रालयाची भेट घेणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. हे सर्व आरोप मुश्रीफ यांनी तत्काळ फेटाळून लावले. मंगळवारी सोमय्या यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली व त्यासंबंधीची कागदपत्रे सुपूर्द केली.

या तक्रारीत त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये सर्वसामान्य शेतकर्‍यांनी गुंतवणूक केल्याचा दावा केला असला तरी त्याबतचे कोणतेही पुरावे मुश्रीफ यांनी दिलेले नाहीत, असे ते म्हणाले.

या कारखान्यात अबिद हसन मुश्रीफ, नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ आणि साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावे 13 कोटी 30 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. हसन मुश्रीफ यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा मनी लाँडरिंग करून पांढरा केला आहे, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

रजत कंझुमर सर्व्हिसेस लि., माउंट कॅपिटल प्रा. लि., मरुभुमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., नेस्टजेन कन्सल्टन्सी सर्विसेस आणि सरसेनापती शुगर्स या शेल कंपन्यांच्या माध्यमातून 78 कोटी 91 लाख रुपये मुश्रीफ यांनी कारखान्यात आणले. या कंपन्यातील अनेक भागधारक हे बेनामी आहेत. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मुश्रीफ यांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून यासंदर्भात ‘ईडी’कडे तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पवारांशी चर्चा केली.

मुश्रीफ यांनी मंगळवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. अनिल देशमुख यांच्यानंतर मुश्रीफ यांना भाजपकडून टार्गेट करण्यात आल्याने पवार चिंतेत आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपावर आपली बाजू मांडताना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. त्यामध्ये काहीही वावगे नाही. यापूर्वीही आयकर विभागाची चौकशी लावून आपल्याला भाजपने गोवण्याचा प्रयत्न केला होता. आता ईडी आणि अन्य यंत्रणांकडून त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पवार यांना सांगितल्याचे समजते. दोन्ही नेत्यांमध्ये या आरोपांना कसे प्रत्युत्तर द्यायचे यावरही चर्चा झाली.

दरम्यान, दिलीप वळसे- पाटील यांच्याशीही शरद पवार यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या मुद्द्यांवर चर्चा केली. साकीनाका येथील बलात्कार प्रकरण, पुण्यात युवतीवर झालेले सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि अन्य घटनांमुळे राज्यात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावर विरोधकही आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी वळसे-पाटील यांना पोलिस यंत्रणा सतर्क करण्याच्या सूचना दिल्या.

Back to top button