इचलकरंजीत पानपट्टी चालकाचा निर्घृण खून | पुढारी

इचलकरंजीत पानपट्टी चालकाचा निर्घृण खून

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : येथील विठ्ठलनगर परिसरात रहेमान मलिक नदाफ (वय 20, रा. विठ्ठलनगर, शहापूर) या पानपट्टीचालकाचा निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या घराजवळच धारदार शस्त्रांनी वार केल्याने नदाफ याचा जागीच मृत्यू झाला. खुनाचे कारण समजू शकले नाही. भरवस्तीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहापूर परिसरातील विठ्ठलनगरमध्ये राहणारा रहेमान नदाफ याने भागामध्ये नुकतीच दोन महिन्यांपूर्वी पानपट्टी सुरू केली होती. पानपट्टी बंद करून तो मित्रांसोबत जेवायला गेला होता. तेथून परतल्यानंतर तो रात्री अकराच्या सुमारास घराजवळ चौकात मित्रांसमवेत बोलत उभा राहिला होता.

यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी नदाफला गाठल व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. मानेवर तसेच डोक्यावर 9 ते 10 तीक्ष्ण वर्मी घाव बसल्याने रहमान जागीच कोसळला. नागरिकांची चाहूल लागताच हल्लेखोरांनी पळ काढला. भागातील वीजपुरवठा खंडित असल्यामुळे आणखी गोंधळ उडाला. रहमानला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रभारी पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आदींनी रुग्णालयात भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. हल्लेखोरांचा विविध पथकाद्वारे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. वर्चस्वाच्या वादातून खून झाला असावा, पोलिसांचा कयास आहे. अधिक तपास शहापूरचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.

Back to top button