आता महाभारत घडणार, वाईटाचा नाश होणार : खा. धनंजय महाडिक | पुढारी

आता महाभारत घडणार, वाईटाचा नाश होणार : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ‘आमचं ठरलंय’ म्हणणार्‍यांनी कूटनीती, कपटनीती करून लोकसभा निवडणुकीत माझा घात केला. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला झेपणार नाही, असे मी याच व्यापिठावरून म्हणालो होतो. आता तसेच घडले आहे. आमचे सरकार आलेय. यापुढे महाभारत होणार आहे. यात वाईटाचा नाश होणार असल्याचा घणाघात खा. धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता केला.

धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने दसरा चौकात आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या आशीर्वादाने आपण अवघड असा सहावा थर रचला. भाजपच्या नेत्यांमुळेच हे शक्य झाले. विधानसभा, लोकसभा त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाडिक परिवाराला आणि भाजपलाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. राजकारणात कोण कायमचा शत्रू नसतो. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदय नक्कीच होत असतो.

सर्व सत्तास्थाने गेल्यानंतर ‘आमचं ठरलंय’ म्हणणार्‍यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. पंढपूरमधील कारखान्याचे दीड हजार सभासद रद्द केले. राजाराम साखर कारखान्याचे एक हजार सभासद रद्द केले. आमचा कारखाना, शिक्षण संस्था प्रशासनावर दबाव आणून बंद पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर व कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करयात आले. माझ्यावर 14 केसेस केल्या. मी काय गुन्हेगार आहे काय? त्यामुळे कार्यकर्तेदेखील अस्वस्थ होते, असेही महाडिक म्हणाले.

याच व्यासपिठावरून दोन वर्षांपूर्वी आपण आमचे सरकार आल्यावर त्यांना झेपणार नाही, म्हणालो होतो. राज्यात पाच वर्षे सत्ता राहणार, या भ्रमात काही जण होते. केंद्रात आणि राज्यातही आता भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यात महाभारत घडणार आहे आणि यामध्ये वाईटाचा नाश आणि चांगल्याला यश मिळणार आहे. वाईटाचा नेहमीच नाश होत असतो, असेही ते म्हणाले.

कपटनीतीने ते जिंकले असले, तरी आम्ही तसे करणार नाही. जिल्ह्यातील सर्व विकासकामे मार्गी लावण्यात येतील. बास्केट ब्रीज शहराची शान असणार आहे. विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. खंडपीठासाठीदेखील प्रयत्न करण्यात येईल, असेही महाडिक यांनी सांगितले.

Back to top button