कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द | पुढारी

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारने महापालिकेतील नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील अध्यादेश गुरुवारी (दि. 4) जारी करण्यात आला. त्यानुसार महापालिकेची सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण रद्द झाली आहे. महापालिकेला राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. दरम्यान, महापालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपली आहे. तेव्हापासून तिसर्‍यांदा निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यादेशानुसार महापालिकेची त्रिसदस्य प्रभाग रचना करण्यात आली होती. त्याबरोबरच राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविल्याने 81 वरून 92 झाली होती.

तीन नगरसेवकांचे 30 प्रभाग आणि दोन नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग करण्यात आले होते. पहिल्यांदा ओबीसी वगळून आणि पुन्हा ओबीसीसह अशा आरक्षण सोडतीही काढल्या आहेत. मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. परंतु, राज्य सरकारने नुकताच नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाला आता पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे. महापालिका निवडणूक प्रक्रिया तीनवेळा करून पुन्हा रद्द झाली आहे. गेली दोन वर्षे प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा त्यासाठी राबता सुरू आहे. सुमारे शंभरच्यावर कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत.

निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होते तोपर्यंत राज्य सरकारकडून नवा निर्णय येतो किंवा निवडणुकीला स्थगिती मिळते. त्यामुळे कर्मचार्‍यांनी केलेल्या कामावर पाणी फिरत आहे. दरम्यान, निवडणुकीविषयी संभमावस्था असल्याने इच्छुकांनी हात अखडता घेतला आहे. गणेशोत्सवासह सण-उत्सवासाठी कार्यकर्त्यांनी खर्चाचा तगादा लावल्याने इच्छुक गायब होत आहेत. निवडणूक कधी होईल, याविषयीही ठोस माहिती नसल्याने इच्छुकांनी आता ‘हाताची घडी व तोंडावर बोट’ अशी भूमिका घेतली आहे.

Back to top button