कागल बालक खून प्रकरण : ३ दिवसांत नेमकं काय घडलं? | पुढारी

कागल बालक खून प्रकरण : ३ दिवसांत नेमकं काय घडलं?

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील (कागल नरबळी प्रकरण) सावर्डे येथून अपहरण झालेल्या बालकाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या खून प्रकरणामागे नरबळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. १७ तारखेपासून बेपत्ता असलेल्या ७ वर्षांच्या या बालकाचा खून झाल्याने कागल सह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ताजी अपडेट :  खुनाचा प्रकार नरबळीतूनच : वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचे समोर आले आहे.  अटक केलेल्या संशयिताचे नाव  मारुती तुकाराम वैद्य असे आहे. तपासाची स्थिती आणि गावातील परिस्थिती इथे वाचा.

हा प्रकार नेमका कसा घडला, घटनेमागे नेमके कोण आहेत, गुन्ह्याचं नेमकं कारण काय अशा प्रश्नांची मालिकाच या गुन्ह्याने निर्माण केली आहे.

वरद रवींद्र पाटील असे या मुलाचे नाव आहे. कागल येथील सोनाळी हे त्याचं गाव. सोनाळीतील डॉ. रवींद्र पाटील यांचा तो मुलगा.

वरदचे आजोबा दत्तात्रेय महातुगडे यांनी सावर्डे बुद्रूक येथे नवीन घर बांधले होते. त्याच्या वास्तुशांतीसाठी वरद आणि त्याचे वडील डॉ. रवींद्र आणि आई १७ ऑगस्टला सावर्डे येथे आले होते.

दिवसभर घरातील सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वरद रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गायब झाला.

१७ ऑगस्टला रात्रीच वरद बेपत्ता झाला. वडील आणि नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला. पण वरद सापडला नाही. त्यानंतर मुरगूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

वरदच्या शोधासाठी जिल्ह्यात आणि कर्नाटकातही पथके पाठवण्यात आली, पण वरद मिळून आळा नाही. नातेवाईकही वरदचा तपास करत होते.

२० ऑगस्टला म्हातुगडे यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावर एका तलावात वरदचा मृतदेह मिळून आला.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह गाव तलावात आढळून आला. त्याच्या अंगावर जखमांचे व्रण आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी केली.

७ वर्षांच्या वरदच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत, त्यामुळे त्याला मारहाण करून खून केला असावा असा कयास आहे.

सध्या पोलिसांनी म्हातुगडे यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे

नागरिकांची प्रचंड गर्दी सावर्डे बुद्रुक येथे झाली असून आरोपींना पकडून आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.

अमानुष मारहाण करून मुलाचा खून करण्यात आला असावा तसेच यामागे नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकारामुळे कागल तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button