NDRF ची टीम पुण्यातून कोल्हापूरकडे रवाना, पंचगंगा इशारा पातळीकडे
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी NDRF टीम काही तासांत दाखल होणार आहे. NDRF च्या दोन टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
आज सकाळी ७ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी ३५ फूट ७ इंच इतकी झाली असून तिची वाटचाल इशारा पातळीकडे होत आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास दुपारपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर NDRF च्या दोन टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यापैकी एक टीम कोल्हापूर शहरात तर एक शिरोळमध्ये तैनात राहणार आहे.
बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा हा राज्यमार्ग तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे.
रत्नागिरी महामार्ग बंद झाल्याने कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर पकडला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहेत.