कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघांच्या रचनेत बदल | पुढारी

कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघांच्या रचनेत बदल

कोल्हापूर ; विकास कांबळे : कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघांच्या (गट) तसेच पंचायत समितीच्या मतदारसंघाच्या (गण) संख्येत वाढ झाल्याने गेल्या काही दिवसांपासून गटांच्या आणि गणांच्या रचनेचे सुरू असलेले काम पूर्ण झाले आहे. या बदललेल्या मतदारसंघाच्या माहितीसाठी इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू आहे. परंतु निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे या गटाच्या आणि गणांच्या रचना पाहण्यासाठी इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. लवकरच गटांची आणि गणांची प्रारूप रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार संघांचे प्रारूप रचनेत बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे. 1990 पासून गेल्या 30 वर्षांत लोकसंख्या आणि मतदानामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 9 गट तर पंचायत समितीचे 18 गट वाढणार असल्याने जिल्हा परिषदेचे 76 तर पंचायत समितीचे 152 सदस्य असणार आहेत.

शासनाने मतदार संघाच्या प्रारूप रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व जिल्हा परिषदांना नव्या गटांची व गणांची पुनर्रचना करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू होते. निवडणुका पूर्वनियोजित वेळेत होतील, असे गृहीत धरून हे काम अतिशय जलद गतीने करण्यात आले आहे. गटांची व गणांची पुनर्रचना झाली आहे. मान्यतेसाठी ते निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बदललेल्या मतदार संघांची रचना हरकतीसाठी जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितींची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे इच्छुकांनी तयारी देखील सुरू केली होती. परंतु गटांची व गणांची रचना बदलणार असल्यामुळे या बदललेल्या गटांच्या आणि गणांच्या रचनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

इच्छुकांची धडपड

हक्‍काची गावे आपल्या गटातच आहेत की वगळून अन्य गटामध्ये, गणामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, हे पाहण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. हक्‍काची गावे आपल्या मतदार संघातून वगळण्यात येऊ नये यासाठी अनेकांनी आतापासूनच देव पाण्यात घातले आहेत.

Back to top button