कोकणातील १९० गावांना उधाणाचा धोका | पुढारी

कोकणातील १९० गावांना उधाणाचा धोका

रायगड; सुयोग आंग्रे :  यंदा पावसाळ्यात समुद्राला २५ दिवस मोठे उधाण येणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, तर ३, ४, ५ ऑगस्ट आणि १  सप्टेंबरला या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती रायगडकरांना अनुभवता येणार आहे. लाटांचा थरार हा थरारक क्षण अनुभवणाऱ्यांना ही पर्वणी असलीतरी रायगड जिल्ह्यातील  तब्बल १९० गावांना या मोठ्या उधाणाच्या भरतीचा धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामध्ये समुद्र किनारी असणाऱ्या ६२ आणि खाडी किनारी वसलेल्या १२८ गावांचा समावेश आहे.

पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येत असते. याचा फटका किनारपट्टीवरील भागात पाहायला मिळतो. समुद्र किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांमुळे किनारपट्टीवरील भागात समुद्राचे पाणी शिरते. यामुळे शेती नापीक होते, तर आसपासचा परिसरही जलमय होत असतो. अशातच मोठा पाऊस झाला तर २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी समुद्राला येणाऱ्या भरती- ओहोटीचा अभ्यास करते आणि संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो.

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २५ दिवस मोठे उधाण येणार आहे. हे सर्वच दिवस किनारपट्टी व खाडी किनाऱ्यावरील गावांसाठी धोक्याचे असणार आहेत, कारण प्रत्येक दिवशी किमान ४.५० मीटर उंचीच्या समुद्री उधाणाच्या लाटा किनारपट्टीवरील भागात धडकणार आहेत, तर ३, ४, ५ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला येणारी भरती ही या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती
असणार आहे. या दिवशी ४.८७ मीटर म्हणजेच जवळपास पाच मीटर उंचीचे उधाण समुद्राला येणार आहे.

रायगड जिल्हय़ातील समुद्र, खाडी किनाऱ्यांवर वसलेल्या १९० गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असू शकणार आहे. याशिवाय आंबा, रामराज, पाताळगंगा, भोगावती, मांडला, कासाड, गाढी, लेंडी, वाजापूर, ओढा, उसर्ली, किक्री, डोगराचा ओहोळ, धवरी, उल्हास, पेज, काळ, गोद, मेढा, पिटसई, तळेगाव, पढवण, कुडलिका, वलकी, बाळगंगा, सावित्री, गांधारी, नागेश्वरी, भावे, ओढा, जानसई, कार्ले, दांडगुरी या नद्यांच्या किनाऱ्यावर २६२ गावांना या उध- णाचा संभाव्य फटका बसण्याची शक्यता असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हय़ात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वयित केली जाणार आहे.

अलिबाग तालुक्यात २५, मुरुड तालुक्यात ११, उरण तालुक्यात ८, श्रीवर्धन तालुक्यात १८ अशी एकूण ६२ गावे समुद्रालगत आहेत. या गावांमध्ये १ लाख ७३ हजार ४३४ इतकी लोकसंख्या आहे. अलिबाग तालुक्यातील ४७, मुरुड तालुक्यातील १२, पेण तालुक्यात १५, पनवेल तालुक्यात १६, माणगावमध्ये ९, श्रीवर्धनमध्ये १०, म्हसळा तालुक्यात १९ अशी १२८ गावे खाडीच्या लगत आहेत. समुद्राला मोठी भरती असेल आणि त्याच दिवशी अतिवृष्टी झाली तर या गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याचा धोका आहे.

Back to top button