मुंबईतील सोने-चांदी व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खून | पुढारी

मुंबईतील सोने-चांदी व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खून

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी बाजारातून बेपत्ता झालेले मुंबईतील सोने-चांदीचे व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी (वय ५५, रा.भाईंदर मुंबई) यांचा रस्सीने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या आधारे रत्नागिरीतील एका सोने-चांदी व्यापार्‍यासह अन्य दोन संशयितांना अटक केली. गुरुवारी (दि. २२) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भूषण सुभाष खेडेकर (४२ ,रा.खालची आळी),महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा.मांडवी सदानंदवाडी) आणि फरीद महामुद होडेकर (३६ ,रा.भाट्ये) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. किर्तीकुमार कोठारी हे मुंबई येथून व्यवसायिक कामासाठी रविवार १८ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील श्रध्दा लॉजमध्ये उतरले होते. सोमवारी आपल्या व्यवहाराचे कामकाज केल्यानंतर रात्री गोखले नाका येथून आगाशे कन्याशाळेजवळ चालत गेल्याचे सिसीटिव्ही फूटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर येथून ते बेपत्ता झाले होते.

पोलिसांनी किर्तीकुमार यांचा तपास करताना शहरातील सीसीटिव्ही फूटेज पाहिले असता किर्तीकुमार हे आगाशे कन्या शाळेसमोरील त्रिमुर्ती ज्वेलर्समध्ये जाताना दिसून आले. परंतू ते दुकानातून पुन्हा बाहेर दिसले नाहीत. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दुकान मालक भूषण खेडेकरसह या गुन्ह्यात त्याला मदत करणार्‍या अन्य दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखताच भूषणने मी महेश आणि फरीद या दोघांच्या मदतीने किर्तीकुमार कोठारी यांना आधी हातांनी आणि नंतर रस्सीने गळा दाबून ठार मारल्याचे कबुल केले.

हेही वाचलंत का?

Back to top button