कोकण : टोलमाफीसाठी शिवसेना पुन्हा आक्रमक!
कणकवली , पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पुन्हा एकदा टोलवसुलीच्या हालचाली सुरू केल्याने शनिवारी सकाळी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आ. वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ओसरगाव टोलनाक्यावर धडक देत आंदोलन केले. जोपर्यंत सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी जाहीर केली जात नाही, महामार्गबाधित लोकांचे प्रश्न व अन्य समस्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोलवसुली सुरू करण्यात येऊ नये अन्यथा होणार्या परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल असा इशारा आ. वैभव
नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणला दिला.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रामू विखाळे, राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर,ओसरगाव सरपंच प्रमोद कावले,वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, रिमेश चव्हाण,आदित्य सापळे, सिद्धेश राणे, योगेश मुंज, अजित काणेकर, गौरव हर्णे,रोहित राणे, मंगेश राणे, उत्तम लोके, सदानंद मोरे, नितीन धुरी, रवी ठाकूर, बाबू केणी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या करिमुनिसा या कंपनीला पत्र पाठवून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचे सहकार्य घेऊन टोलवसुली तात्काळ सुरू करा, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. त्यामुळे टोलवसुली लवकरच सुरू होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली. हातात भगवे झेंडे शिवसैनिकांनी घेतले होते. शिवसेना जिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जिल्हावासीयांना टोलमाफी मिळालीच पाहिजे यासह टोलवसुली विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,कोल्हापूरचे अधिकारी पी. डी. पंदरकर यांच्याशी आ. वैभव नाईक व संदेश पारकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी स्तरावर आपण बैठक घ्यावी असे ठरले होते, मात्र ती बैठक आपण घेतलेली नाही. त्याचबरोबर जिल्हावासीयांना टोलमाफी मिळालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आ. वैभव नाईक यांनी जोपर्यंत सिंधुदुर्गवासियांना टोलमाफी दिली जात नाही तोपर्यंत शिवसेना टोलवसुली करू देणार नाही. जर यातून कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहिल असा इशारा दिला.
आता जिल्हावासीयांचे लक्ष
महामार्गाचे काम अपूर्ण आहे, अनेक बाधितांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, महामार्गाशी निगडीत अनेक प्रश्न प्रलंबित आहे, असे असताना टोलवसुलीची घाई का? पोलिस संरक्षण घेऊन किती दिवस तुम्ही टोलवसुली करणार? हे सर्व मार्गी लावल्याशिवाय टोलवसुली सुरू करू नका असा इशारा आ. वैभव नाईक व संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणला दिला. त्यामुळे आता महामार्ग प्राधिकरण कोणती भूमिका घेणार? सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी होणार का? याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहेत.