रत्नागिरी : रघुवीर घाट आणि रसाळगड पर्यटनासाठी दोन महिने बंद | पुढारी

रत्नागिरी : रघुवीर घाट आणि रसाळगड पर्यटनासाठी दोन महिने बंद

खेड : अनुज जोशी : कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट दि. १ जुलैपासून दोन महिन्यांसाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केले आहेत. रस्ता व डोंगर ढासळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. याबाबतचा लेखी आदेश उपविभागीय अधिकारी सौ. राजश्री मोरे यांनी समंधीत सर्व यंत्रणाना दिला आहे.

खेड तालुक्यातील रघुवीर घाट व रसाळगड ही दोन ठिकाणी कोकणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची आवडती ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून बनू लागली आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीत या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी जाणे हे जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांनी रसाळगड व रघुवीर घाट पर्यटनासाठी दि.१ जुलै २०२२ पासून पुढील दोन महीने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशान्वये पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येणार्‍या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. परंतु, सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने उचलेल्या या पावलाचे स्वागत देखील पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने खेड तालुक्यातील खोपी व सातारा जिल्ह्यातील कंदाटी खोऱ्यातील गावांचा पावसाळी पर्यटनातून मिळणारा रोजगार हिरावणार आहे. तर रसाळगडवर देखील पर्यटकांसाठी प्रवेशबंदी असल्याने पर्यटक व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिथे पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. तसे आदेश मी पारित केले आहेत. परंतु, सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोर्‍यातील गावांना विवीध कामे, औषधोपचार आणि अत्यावश्यक सेवासाठी याच रघुवीर घाटाचा एकमेव पर्याय असल्याने ते या घाट रस्त्याचा वापर करू शकतील अशी मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती येथील प्रांताधिकारी सौ. राजश्री मोरे यांनी दिली आहे.

रघुवीर घाट व रसाळगड या ठिकाणी प्रशासनाचा पर्यटनबंदीचा आदेश आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आजपासून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामस्थ व बंदोबस्त सुरू करणार आहोत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी दिली.

 

Back to top button