रत्‍नागिरी : दापोलीत व्यवसायिकाला जमावाकडून मारहाण | पुढारी

रत्‍नागिरी : दापोलीत व्यवसायिकाला जमावाकडून मारहाण

दापोली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशमधून दापाेली येथे भंगार आणि काजूबी व्यवसाय करणाऱ्या गंगासागर शुक्ला व त्याच्या घरमालकांना जमावाने मारहाण केली. या वेळी शुक्ला यांच्या घरातील साहित्याचे देखील नुकसान करून त्यांचे घरात असलेले कपडे, व इतर साहित्‍य या जमावाने जाळून टाकले.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये राजकीय पदाधिका-यांचा  सहभाग असल्‍याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. शुक्‍ला, त्याची पत्नी व मुलगा असे देगाव बौध्दवाडी येथील मुकुंद मंडपे यांच्या गोठ्यात राहतात. त्यांनी मंडपे यांचेकडून १२ गुंठे जागा विकत घेतली आहे. तेथे घराचे जोते बांधण्याचे काम सुरु असताना शनिवार (दि. ९) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुजल मंडपे याने शुक्ला यांना फोन करून गावातील काही लोक घराचे जोते तोडत असल्‍याची माहिती दिली. त्‍यानंतर ते घरी आले. त्यांना पाहून लोकांनी शुक्ला यांना लाथाबुक्याने मारहाण सुरू केली. तेव्हा शुक्ला यांनी तेथून पळ काढला.

दरम्‍यान, शुक्ला यांच्या घरातील तांदूळ, कांदे, बटाटे यांची नासधूस केली. चारचाकी वाहन उलटून टाकले व घरातील कपडे, सुक्या काजूबिया वाड्याच्या समोर असलेल्या शेतात डिझेल ओतून जाळून टाकले. शुक्ला व त्याची पत्नी या घरमालक मंडपे यांच्या घराच्या माळ्यावर जाऊन लपल्‍याने त्यांचा जीव वाचला. तेव्हा काही लोकांनी घरमालक मुकुंद मंडपे यांनाही मारहाण केली.

Back to top button