औरंगाबाद अपघात : दुचाकी आणि बैलगाडीचा अपघात; दोन तरूणांचा मृत्यू
काल (बुधवार) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिवरखेडा गौतळा रोडवर विनायकराव पाटील कॉलेज जवळ दुचाकी व बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेले दोन्ही तरूण ठार झाले.
हिवरखेडा गौतळा रोडवर दुचाकी शाईन गाडी क्रं-एम एच २० इ डब्लू १०५९ यावरुन ऋषिकेश चव्हाण (वय २०, रा. दत्त कॉलनी कन्नड) व कुणाल चव्हाण (वय २०, रा. कॉलेज रोड कन्नड) हे शहराकडे येत होते. यावेळी हिवरखेडाकडे किशोर जाधव हे आपली बैलगाडी घेवून येत होते.
समोरासमोर बैलगाड़ी व दुचाकीची धडक होवून अपघात झाला. यात दोन्ही तरुण व एक बैल गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून दोन्ही तरुणांना तात्काळ शहरातील खासगी दवाखाण्यात दाखल केले. यावेळी कुणाल चव्हाण याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर ऋषिकेश चव्हाण याला गंभीर दुखापत झाल्याने औरंगाबाद येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. दरम्यान उपचारावेळी त्याचाही मृत्यू झाला.