औरंगाबाद : पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मनिष कलवानिया यांना शौर्य पदक जाहीर | पुढारी

औरंगाबाद : पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मनिष कलवानिया यांना शौर्य पदक जाहीर

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत अपर पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली येथे कार्यरत होते. १८ ऑक्टोबर २०२० रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असताना ५  नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मनिष कलवानिया यांनी यश मिळाले होते. नक्षल चळवळीला हादरा देणाऱ्या शौर्यपूर्ण कामगिरीबाबत त्यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडून ‘शौर्य पदक’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर किसनेली गावाजवळ ६० ते ७० नक्षली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तत्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वाखालील सी-६० कमांडो पथकाने १५ किमी घनदाट जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबविले होते. यावेळी नक्षलींनी पथकाच्या दिशेने जोरदार गोळीबार केला होता. त्याला प्रत्युतरादाखल कमांडोनी गोळीबार सुरू केला. यावेळी कलवानिया यांच्यासह सी-60 कमांडो पथकाने आपल्या प्राणाची बाजी लावून आठ तासांच्या चकमकीनंतर नक्षलींचा हल्ला परतावून लावला होता.

नक्षली पळून गेल्यानंतर त्या ठिकाणाची पाहणी केली असता तेथे ५ जहाल नक्षलींचे मृतदेह आढळून आले होते. मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा, कुकर बॉम्ब, स्फोटके व इतर नक्षली साहित्य आढळून आले होते. या अभियानामध्ये टिपागड दलम, कोरची दलम, आणि प्लाटुन १५ मधील जहाल नक्षलवादींना टिपण्यात यश आले होते. या चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयांवर १८ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button