औरंगाबाद : आठवडाभरात 65 हजार बांबूची विक्री; दोन लाखांची उलाढाल
औरंगाबाद; जे. ई. देशकर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम राबवण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागरण सुरू आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आल्याने प्रत्येक जण तिरंगा विकत घेत आहे. तिरंगा लावण्यासाठी आवश्यक असलेला बांबू विकत घेण्यासाठीही मोठी गर्दी उसळली असून या आठवडाभरात 60 ते 65 हजार बांबूच्या विक्रीतून सुमारे दीड ते दोन लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती बांबू विक्रेत्यांनी दिली.
शहरातील बांबू गल्लीत विविध आकारांच्या बांबू काठ्यांची आठ दुकाने आहेत. विविध कामांसाठी लागणार्या बांबू काठ्यांच्या विक्रीतून दरवर्षी सात ते आठ लाखांची उलाढाल होते. दरम्यान, यावर्षी आझादी का अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी हर
घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी शासकीय पातळीवर व काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून, अनेक जण मोफत तिरंगा वाटप करणार आहेत. तर, अनेक नागरिकांनी स्वत: तिरंगा खरेदी केला आहे. तिरंगा लावण्यासाठी आवश्यक असलेल्या बांबू काठ्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. 4 फूट ते 8 फुटांचे बांबू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 15 रुपये ते 30 रुपये अशी किंमत बांबूची ठेवण्यात आली आहे
14 ऑगस्टपर्यंत मागणी
या आठवडाभरात एका दुकानामधून सात ते आठ हजार बांबू काठ्यांची विक्री झाली आहे. या परिसरातील आठ दुकानांतून 60 ते
65 हजार बांबू काठ्यांची विक्री झाली आहे. आणखी 14 ऑगस्टपर्यंत बांबूची मागणी राहणार आहे. वर्षभरात सात ते आठ लाखांची उलाढाल होते, परंतु हर घर तिरंगा मोहिमेमुळे आठवडाभरातच सुमारे दीड ते दोन लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती बांबू
विक्रेत्यांनी दिली.