औरंगाबाद : ठिबक सिंचनचे साहित्य न देता केली फसवणूक
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ठिबकचे साहित्य न देता, शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या जय किसान अॅग्रो व संतकृपा एरिगेशन यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेने सोमवारी (दि.4) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिल्लोड तालुक्यातील जय किसान अॅग्रो व सोयगाव तालुक्यातील संतकृपा एरिगेशन यांच्याकडे शेतकऱ्यांनी ठिबक अनुदानासाठी कागदपत्रे जमा केली होती. दोन्ही दुकानदारांनी शेतकर्यांना त्यांच्या नावावर अनुदान मंजूर झाल्याचे सांगत, ठिबक घेऊन जावे, असे कळविले. शेतकरी ठिबक घेण्यासाठी गेले असता, त्यांनी शेतकर्यांच्या हातात 3 बंडल देऊन फोटो काढून घेतले. मात्र, साहित्य काही दिले नाही. नंतर शेतकरी या एजन्सीकडे ठिबकचे सामान मागण्यासाठी गेले असता,‘मी तुम्हाला संपूर्ण सामान दिलेले असून, त्याबाबतचा माझ्याकडे फोटोचा पुरावा आहे,
माझ्याकडे तगादा लावल्यास पोलिस तक्रार दाखल करेन,’ अशी त्यांनी धमकी शेतकऱ्यांना दिली. या प्रकरणी तीव— आंदोलन छेडण्यात
येईल, असा इशारा बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप हारदे, प्रदेश सचिव सुरेश वाकडे, सतीश वेताळ, विनोद बगळे यांनी दिला आहे.