अजिंठा : वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, वन्य प्राण्यांची भटकंती; वन विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

अजिंठा : वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, वन्य प्राण्यांची भटकंती; वन विभागाचे दुर्लक्ष

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा घाटातील जंगलात फुटा दरवाजाजवळील तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात गेल्या काही महिन्यांपासुन पाणी भरण्यात आले नसल्याने, वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. याबाबीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे हेतु:पुरस्सर दुर्लक्ष दिसून येत आहे. अजिंठा वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जंगलात  वनविभागाने  ठिकठिकाणी कृत्रिम १० पाणवठे तयार केले  होते. मात्र वाढत्या उन्हामुळे हे पाणवठे आजघडीला कोरडेठाक पडले आहेत. आजघडीला हे पाणवठे नुसती शोभेची वस्तू बनले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणीच मिळत नसल्याने हे प्राणी पाण्याच्या शोधात भटकताना दिसून येत आहेत.

या वन परिक्षेत्रात पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने वन्य प्राणी, मुके जीव पाण्यावाचून तडफडत आहेत. त्यातच  पुरेसे खाद्यही मिळत नसल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. वन्य प्राण्यांचे हे स्थलांतर धोक्याचे असून प्राण्यांसाठी पाण्याची पर्यायी  व्यवस्था  करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अजिंठा वन परिक्षेत्रात वन्य प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, जंगलात कुपनलीका खोदून कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात नियमितपणे पाणी  भरले जात  होते . मात्र सध्यास्थितीत कडक उन असल्याने, पाणवठ्यात पाणी भरण्यात आलेले नाही, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणवठे पाण्याअभावी कोरडे राहत असल्याने, वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे .वन विभागाचे या कृत्रिम पानवठ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झील्याचे दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणीही मिळत नसल्याने वन्य प्राणी  परिसरातील गाव, वस्तीकडे  धाव घेत आहेत.

दरम्यान पिंपळदरी, वसई, गावांच्या सभोवताली  अजिंठा लेणीच्या  डोंगररांगा आहेत. घनदाट  जंगलाने  वेढलेल्या या  परिसरातील  नागरिकांना  वन्य प्राण्यांचे क्वचितच दर्शन घडते. परंतु आता नीलगाय, हरीण, तडस, ससा, मोर, पक्षीसह  वन्य प्राण्यांनी  मुख्यत: वानरांनी परिसरातील वस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. गाव परिसरातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी  वानरांचे  टोळकेही दृष्टीस  पडत आहेत. मात्र हे वानर गावातील घरांच्या  छतावर उड्या मारून पत्रे आणि कौलांची नासधूस करत आहे. रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी वन्य प्राण्यांच्या भटकंतीने ग्रामस्थही हैराण झाले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेले हाल लक्षात घेत कृत्रीम पाणवठ्यात त्वरीत पाणी भरण्याची मागणी वन्यप्रेमी आणि ग्रामस्थांकडून होत आहे .

हेही वाचलत का ?

 

Back to top button