पुणतांबा; पुढारी वृत्तसेवा : पुणतांबा गावाला वरदान ठरणार्या जलस्वराज्य प्रकल्पातील सुमारे 17 कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरी यामधील राहिलेल्या त्रुटीबाबत असलेल्या तक्रारी जीवन प्राधिकरणाने तातडीने दूर कराव्यात यासाठी प्राधिकरणाला पत्र देणार असल्याचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.
जलस्वराज्य टप्पा – 2 मधून येथील नवीन पाणी योजनेचे काम गेल्या चार पाच वर्षांपासून सुरू आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात असले तरी योजना कार्यान्वित किती कालावधीत होणार? याबद्दल चर्चा आहे. योजना कामात काही त्रुटी असून कामाच्या दर्जाबाबत वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. योजना कामाची कार्यकर्त्यांनी कोल्हे यांना माहिती दिलेली आहे. जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडे तक्रार करून ग्रामसभेतही आवाज उठविला. मात्र कार्यवाही झालेली नाही.
कोल्हे पुणतांबा येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, योजना कामातील तक्रारीनुसार त्रुटी दूर करून देण्याकरिता अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत पाहणी करून त्रुटी दूर कराव्यात, यासाठी आपणही जीवन प्राधिकरणला पत्र देऊन तातडीने दखल घेण्याची सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणतांबा गावाला वर्षानुवर्षे भेडसावणार्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेला पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्याने योजना जागेसह मंजूर मिळाली. या कामाचे समाधान असुन योजनेतील सर्व त्रुटी दूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने योजना हस्तांतरित करावी, असेही कोल्हे यांनी सांगितले. यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकर्त्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली.