

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : पाऊस झाला नसल्याने बैठकीत ठरल्याप्रमाणे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान कुकडीचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणार्या कुकडी डाव्या कालव्यावर मतदारसंघातील 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. कर्जत तालुक्यात कुकडी व सीना धरणाचे आवर्तन सोडले जात असते. या आवर्तनातून उपलब्ध होणार्या पाण्याचा येथील शेतकर्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यंदा पाऊस कमी झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र, टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. याच अनुषंगाने कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आमदार पवार यांनी कुकडी व सीना धरणाचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस न झाल्यास 15 डिसेंबरपासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याच बैठकीत 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या पाण्याची मोठी गंभीर परिस्थिती मतदारसंघात शेतकरी व नागरिकांना टंचाई भेडसावत असल्याने तातडीने कुकडी व सीना धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार पवार यांनी पालकमंत्री विखे यांची भेट घेऊन केली आहे.
टँकर, चारा डेपो सुरू करा
कर्जत तालुक्यातील 74 गावे व जामखेड तालुक्यातील 75 गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यामुळे टँकर, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्यात यावेत, प्रलंबित कांदा अनुदानाची रक्कम शेतकर्यांना मिळावी, अशी मागणी आमदार पवार यांनी केली आहे.
हेही वाचा :