नगर : संपात शिक्षकांचा आसूड कडाडला; हलगी घेऊन महिला शिक्षिकाही सहभागी | पुढारी

नगर : संपात शिक्षकांचा आसूड कडाडला; हलगी घेऊन महिला शिक्षिकाही सहभागी

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांनी थेट सरकार विरोधात हाती आसूड घेतले. अंगावर आसूड ओढून शिक्षक, शिक्षकेतर, सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शनची मागणी केली. संपाच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि.18) शहरातील न्यू. आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे आसूड आंदोलन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनात सहभागी होऊन संपाला जाहीर पाठिंबा दिला.

या आंदोलनात जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अनंत गारदे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरिष टेकाडे, खासगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरुमुडे, प्रा. राजेंद्र जाधव, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, भाऊसाहेब कचरे, कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, धनंजय म्हस्के, शेखर उंडे, श्रीराम खाडे, प्रशांत म्हस्के, राजेंद्र कोतकर, भारत दळवी, आप्पसाहेब जगताप, घनशाम सानप, योगेश गुंड आदी सहभागी झाले. आमदार संग्राम जगताप म्हणाले, कर्मचार्‍यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचलेल्या आहेत.

मात्र, सरकारने हा विषय सकारात्मकपणे चर्चेला घेतलेला नाही. सरकारने सकारात्मक पाऊल टाकले नसल्याने लोकशाही मार्गाने जुनी पेन्शनसाठी बेमुदत संप सुरू आहे. सरकारने आंदोलकांच्या तीव्र भावनांचा विचार करावा. सर्व शिक्षक, कर्मचार्‍यांनी आपली एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनास त्यांनी जाहीर पाठिंबा दिला.

पोतराजच्या वेशभूषेत शिक्षकाने डोक्यावर जुनी पेन्शन मागणीची टोपी परिधान करून अंगावर आसूड ओढून सरकारचा निषेध नोंदविला. तर, महिला शिक्षिकाही हालगी वाजवून आंदोलनात सहभाग नोंदविला. सरकारने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी. सरकारने आंदोलकांचा अंत पाहू नये, अन्यथा आसूड घेऊन सर्व शिक्षक, शिक्षकेतर व सरकारी कर्मचारी सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

Back to top button