नगर : कोपरगावी 9 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन लाभ ; ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

नगर : कोपरगावी 9 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन लाभ ; ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोपरगाव शहरात एस.एस.जी. एम. महाविद्यालय, के. जे. एस. महाविद्यालयासह तालुक्यात 60 विद्यालयांमध्ये सुमारे 9 हजार विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कोपरगाव मतदार संघात राबविण्यात आला.

यावेळी एस.एस.जी. एमचे प्राचार्य आर. आर. सानप, के.जे. एसचे प्राचार्य बी. एस. यादव, उपप्राचार्य डी. एस. सोनवणे, संतोष पगारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, विजय आढाव, जगदीश मोरे आदी उपस्थित होते.

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी. कोणत्याही समस्येला घाबरू नये. तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला दिला. मुलांना वेळेच्या नियोजनाविषयी त्यांनी काही कानमंत्र दिले. नियोजनाचे महत्व सांगत महत्त्वाच्या सूचना केल्या.  पंतप्रधान मोदी म्हणाले, परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, ते आधीच माहिती असते.

त्यानुसार आपले नियोजन करू शकतो, मात्र त्यात नेमके आधी काय करावे. सुरुवात कुठून करावी, हे समजत नाही. या विचाराने आपण गोंधळतो व थकवा जाणवतो. आपल्याला कामाचा थकवा येत नाही, पण एवढी कामे करायची आहेत, या विचारानेच दमतो. त्यामुळे कामांची वाटणी करता येणे आवश्यक आहे. वेळेचे महत्त्व व कोणत्या विषयात आवड आहे, हे लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे, असे ते म्हणाले.

2018 पासून  ‘परीक्षेवर चर्चा..!’
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार करून ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात तणावमुक्त राहता यावे, यासाठी सन 2018 पासून ‘परीक्षेवर चर्चा’ (परीक्षा पे चर्चा) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

Back to top button