नगर : श्रीगोंद्यात सरासरी 82 टक्के मतदान
श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीत 34 हजार 369 पैकी 28 हजार 400 सरासरी म्हणजेच 82 टक्के मतदान झाले. काष्टी, बेलवंडीत किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर ोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी काष्टी, बेलवंडी येथील मतदान केंद्राला भेट देऊन कायदा सुव्यवस्थेची पाहणी केली. काष्टीत दुपारी एका मतदानावरून माजी सभापती अरूणराव पाचपुते व सरपंचपदाचे उमेदवार साजन पाचपुते यांच्यात आमने-सामने बाचाबाची झाली. बेलवंडीत आण्णासाहेब शेलार यांचे बंधू अशोक शेलार व सरपंचपदाचे उमेदवार अतुल वाजे यांच्यात सकाळी बचाबाची झाली. पोलिसांनी दोघांना समज दिल्याने वाद निवाळला.
काष्टीतील कैलासराव पाचपुते यांच्या गटाने परिक्रमा पब्लिक स्कुलच्या बसेमधून मतपेट्या श्रीगोंद्याला नेण्यावर आक्षेप घेतला. त्यावर तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी राज्य परिवहन महामंडळाची एक बस पाठवून मतपेट्या श्रीगोंद्याला आणल्या. काष्टीत 11 हजार 104 पैकी आठ हजार 843 (80 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बेलवंडी आठ हजार 862 पैकी सात हजार 003 (79 टक्के) घोगरगाव तीन हजार 175 पैकी दोन हजार 719 (86 टक्के), पारगाव सुद्रिक पाच हजार 403पैकी चार हजार 781 (86 टक्के), तांदळी दुमाला 2489 पैकी दोन हजार 346 (90टक्के), माठ एक हजार 396पैकी 1057 (80 टक्के), थिटेसांगवी एक हजार 67 पैकी 950 (90टक्के), तरडगव्हाण 686पैकी 656 (89 टक्के), चवर सांगवी 267पैकी 255 (95टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
काष्टीकडे जिल्ह्याचे लक्ष
काष्टी ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी युवानेते प्रतापसिंह पाचपुते व साजन पाचपुते दोन सख्खे चुलत बंधू नशीब आजमावत आहेत. दोन्ही गटाकडून आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला जातोय.