मयूर टेकडी डोंगरात बिबट्याचा वावर ; पिंजरा लावण्याची मागणी
मढी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे मयूर टेकडी लगत असलेल्या डोंगरात बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे. रात्री शेतात दारे धरताना शेतकर्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, बिबट्यांकडून रात्रीच्या वेळी शेतकर्यांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.
मढी येथे आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. रात्री शेतात जाताना प्रदीप पाखरे व छगन पोळ यांना हा बिबट्या रस्त्यावरून जाताना दिसला. माणसाला पाहून हा बिबट्या रस्त्यालगत असलेल्या मयुर टेकडी झाडीत जाऊन बसला. प्रदीप पााखरे यांंनी भ्रमणदूरध्वनीवरून शेतकर्यांना व वन विभागाच्या अधिकार्यांना बिबट्या आल्याचे कळविले. यानंतर तातडीने वनपरीक्षेत्र अधिकारी वाघुलकर, वनरक्षक संदीप कराळे, वन कर्मचारी विष्णू मरकड, अशोक कुसारे, समीर मोमिन, गणेश पाखरे तातडीने दाखल झाले. वन कर्मचार्यांनी पाहणी केली. बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. वन विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांना साधव राहण्याचा सल्ला दिला. पिंजरा लावण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मढी-मायंबा परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यात व मढी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्या भीतीने परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.