नगर : जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरणार
नगर; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही वर्षांपासून निर्बंध असलेल्या रिक्त जागांच्या पदभरतीसाठी शासनाने आता हिरवा कंदील दर्शवला आहे. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुधारीत आकृतीबंध आठ दिवसांत सादर केला जाणार असून, त्यानंतर सर्वच विभागातील सरळसेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून समजले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त जागाही आता भरल्या जाणार आहेत. प्रशासनाने तशी तयारी केलेली आहे. आठ दिवसांत नगर झेडपीचा सुधारीत आकृतीबंध समितीकडे पाठविला जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष हे सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून, औरंगाबादचे उपायुक्त हे सचिव आहेत. या समितीच्या मार्गदर्शनानंतर लवकरच जिल्हा परिषदेतील आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामपंचायत, समाजकल्याण अशा सर्वच विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.