ओला दुष्काळ प्रश्नावर आंदोलन उभारणार; किसान सभा, अकोले येथे राज्य अधिवेशनाचा श्रीगणेशा | पुढारी

ओला दुष्काळ प्रश्नावर आंदोलन उभारणार; किसान सभा, अकोले येथे राज्य अधिवेशनाचा श्रीगणेशा

अकोले; पुढारी वृत्तसेवा: राज्यात परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात गेल्याने राज्यभर 36 लाख हेक्टरवरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकर्‍यांना आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व देखावा करीत आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात सलग तीन दिवस ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार असल्याचे सुतोवाच किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी केले.

सोमवारी (दि.31) अकोले. येथे अ.भा. किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनास उत्साहात प्रारंभ झाला. 2 नोव्हेंबर पर्यंत चालणार्‍या या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आ. जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवलेंसह 65 राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रातून 23 जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले 300 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

शेतकरी रॅलीनंतर पत्रकार परिषद व जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी डॉ.अजित नवले बोलत होते. यावेळी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, जे.पी.गावित, आ. विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख व अर्जुन आडे यांनी संबोधित केले.
डॉ.अजित नवले म्हणाले, केंद्रात मोदी सरकार सातत्याने शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे धोरण राबवित आहे. देशभर यामुळे शेती संकट अधिक तीव्र होत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

एक वर्षभराच्या ऐतिहासिक व विजयी शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले, पण शेतकर्‍यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा असे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत.

दुसरीकडे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे करणे हे सुद्धा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय यांचे संरक्षण व संवर्धन हे आज कळीचे प्रश्न बनले आहेत. किसान सभेच्या अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करून लढ्याची पुढील दिशा ठरणार असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

अधिवेशनापूर्वी पार पडली रॅली..!
अधिवेशनापूर्वी 31 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकर्‍यांची रॅली पार पडली. बाजारतळ अकोले येथून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामीण श्रमिक व ग्रामीण कामगार सहभागी झाले होते.

Back to top button