फडणवीसांची खदखद शिंदेंना काम करू देणार नाही : आ. मिटकरी | पुढारी

फडणवीसांची खदखद शिंदेंना काम करू देणार नाही : आ. मिटकरी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या भूमीत वारकर्‍यांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न देता, उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक पद नसल्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस यांना तेच पद घेण्यासाठी नियतीने भाग पाडले. मुख्यमंत्री पद भोगलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री पद दिल्यानंतर फडणवीस यांचा जळफळाट आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रासदायक ठरणारा आहे, असे टीकास्त्र सोडून, शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त असताना सत्तेच्या हव्यासापोटी बिनखात्याचे मंत्री सर्वत्र फिरत आहेत.

हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. जनता तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे आ. अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना दिला. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील बाजार तळावर आयोजित सभेत ते बोलत होते. 54 कोटी रूपये निधी उपलब्ध झाल्यानंतर ब्राम्हणी, चेडगाव, मोकळओहोळ, उंबरे, पिंप्री अवघड, कुक्कढवेढे, सडे या सात गावांसाठी लाभदायी ठरणार्‍या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी आ. प्राजक्त तनपुरे होते.

आ. मिटकरी यांनी भाजप पक्षाच्या भूमिकांबाबत चौफर हल्ला चढविला. ते म्हणाले, ज्या देशातील महान व्यक्तींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध केला. त्याच महापुरूषांच्या नावाचा वापर करून जनतेमध्ये भ्रम पसरविला जात आहे. वेगवेगळे नावाचे पक्ष राजकारणामध्ये कार्यरत आहेत. परंतु, शिंदे आडनावाचा पक्ष तयार केल्याचा भीम पराक्रम भाजपने केला आहे. संविधानापेक्षा मनुस्मृतीला महत्त्व देणार्‍या भाजपकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. विकास कामे न करता छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मंजूर केलेला 350 कोटींचा निधी रद्द केला.

शिंदे-फडणवीस शासनाने केलेले हे पाप जनता विसरणार नाही. शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचा खटाटोप सुरू आहे. शेती पिकांशी संबंधित अनेक गोष्टींवर जीएसटीची जाचक कर आकारणी होत आहे. आ. तनपुरे म्हणाले, शिंदे-फडणवीस शासनातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.हे शासन फार काळ टिकणारे नाही. त्यामुळे मी नव्हे तर आम्ही पुन्हा येऊ हा नारा देत पुन्हा महाविकास आघाडी शासनाची सत्ता राज्यात येणार आहे. प्रास्ताविक योजनेचे अध्यक्ष चंद्रकांत पानसंबळे यांनी केले. माजी उपसरपंच डॉ. राजेंद्र बानकर, विठ्ठल मोकाटे गुरूजी, नवाज देशमुख, सरपंच संजय खरात, कुक्कढवेढे सरपंच दीपक मकासरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, भारत तारडे, रवींद्र आढाव, किसन जवरे, दिलीप जठार, बाळासाहेब लटके, माणिक तारडे, के.एम.पानसरे, साहेबराव दुशिंग, सचिन ठुबे, सुभाष आढाव, संजय तरवडे, रामभाऊ पानसरे, भानुदास कदम, सुरेश सावळे, बापूसाहेब दुशिंग, संतोष हापसे, सचिव श्रीकांत साळे, धीरज पानसंबळ, धनंजय पानसंबळ, सरपंच परवीन शेख, लहानू तमनर, सचिन भिंगारदे, बाळासाहेब खुळे, मिलिंद अनाप, नंदकुमार तनपुरे, महेश उदावंत, आदिनाथ तनपुरे, खतीबभाई देशमुख आदींसह सात गावांतील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले. आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी मानले.

तिरंगा आमच्या हृदयात..!
भाजपने अमृत महोत्सव साजरा करताना जो झेंडा लावणार नाही तो देशद्रोही, अशी मोहीम सुरू केली. हिंदू-मुस्लिम एकीने स्वातंत्र्य मिळाले. परंतु, द्वेष निर्माण करणार्‍या भाजपने देशाला जोडण्याऐवजी तोडण्याचे काम सुरू केले आहे. तिरंग्याचा सन्मान प्रत्येक व्यक्ती करीत आहे. सन 2001 पर्यंत आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा न फडकविणारे व तिरंग्यातील रंगावरून टीका करणारे आरएसएस नेते देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतात, हे दुर्दैवी आहे. तिरंगा फडकविण्याचे खरे मानकरी हे सिमेवरील जवान व त्यांचे कुटुंबिय असल्याचे आ. अमोल मिटकरी म्हणाले.

Back to top button