नगर : बालमटाकळी येथे 17 ऑगस्टला आंदोलन
नगर, पुढारी वृत्तसेवा : बालमटाकळी ते कांबी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे शाळा भरो आंदोलन, एकेरी रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदाताई काकडे यांनी दिला आहे.
बालमटाकळी हे मोठे गाव आहे. बालमटाकळीपासून सुमारे 3 कि.मी. पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. परंतु त्यानंतर पुढील 6 कि.मी.चा रस्ता पावसामुळे खराब आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुलांचे येणे-जाणे शक्य होत नाही. या रस्त्याबाबत शासन व राज्यकर्त्याचे दुर्लक्ष आहे. या रस्त्यावर सुमारे 150 लोकवस्ती आहे. त्यांनाही कोणत्याही साधनांचा वापर करता येत नाही.
याबाबत दि. 1 जुलै रोजी सीईओ आशिष येरेकर यांचे हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनात लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता हा रस्ता होण्यासाठी दि 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9. 30 वा. शेवगाव – गेवराई या महामार्गावर बालमटाकळी येथे विद्यार्थ्यांची शाळा भरो आंदोलन, महामार्गावर एकेरी रस्ता बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
सीईओ येरेकर यांना निवेदन देताना राहुल लेंडाळ, गणेश गाढे, विक्रम गरड, विश्वास लेडाळ, एकनाथ काळे, विठू बागडे, भास्कर सुपेकर, राजू मामा श्री गुरुदेव फलके, संभाजीराजे टाकळकर, बाळासाहेब सौंदर, कैलास लेंडाळ, विलास लेंडाळ, रंगनाथ गोर्डे, शिवाजी शिंदे, जयराम शिंदे, बापू गोर्डे आदी उपस्थित होते.