लंडन : भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध दौर्यात मर्यादित षटकांचे सहा सामने खेळणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 2022 मध्ये होणार्या कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली.
भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौर्यावर असून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. शेवटची पाचवी कसोटी 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणार आहे. पुढील वर्षी मायदेशात जुलै महिन्यात इंग्लंडचा संघ मर्यादित षटकाच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात ओल्ड ट्रॅफोर्ड येथे 1 जुलै रोजी होणार्या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. तर, दुसरा व तिसरा टी-20 सामना अनुक्रमे ट्रेंटब्रिज (3 जुलै) व एजियास बाऊल येेथे (6 जुलै) आयोजित करण्यात येणार आहेत. तर, तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत एजबेस्टन येथे (9 जुलै), दुसरी लढत ओव्हलवर (12 जुलै) व तिसरी लढत लॉर्डस्वर (14 जुलै) आयोजित करण्यात येणार आहे.
१ जुलै २०२२ – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर (पहिली टी-२०)
३ जुलै २०२२ – ट्रेंट ब्रिज, नॉटिंग्हॅम (दुसरी टी-२०)
६ जुलै २०२२ – एजीस बाऊल, साऊदहॅम्प्टन (तिसरी टी-२०)
९ जुलै २०२२ – एडबस्टन, बर्मिंगहॅम (पहिली वन-डे)
१२ जुलै २०२२ – ओव्हल, लंडन (दुसरी वन-डे)
१४ जुलै २०२२ – लॉर्ड्स, लंडन (तिसरी वन-डे)
मँचेस्टर : पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी जिंकल्याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. इंझमामने म्हटले आहे की, 'कोहलीने आपला संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला. पहिल्या डावात 191 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने विजय मिळविला ते पाहता विजयाचे श्रेय भारतीय संघाला दिलेच पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला विजयाचे दावेदार मानण्यात येत नाही तेव्हा कर्णधाराचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. प्रतिकूल स्थितीतही कोहलीने कुशलतेने संघ हाताळला.