बामणोली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या पश्चिम भागात कास, बामणोली परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. या भागात भलरी गितांवर भात लागण सुरु झाली आहे. कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोरे या परिसरात प्रामुख्याने भात, नाचणी, वरी या पिकांची शेती केली जाते. ही डोंगर उतारावरची शेती असल्याने ती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. साधारणपणे जुलै महिन्यामध्ये भात लावण चालू होते. परंतु, यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. अनेकांनी भाताचे तरवे तयार केले होते. परंतु, पाऊस लांबल्याने रोपे वाळून जाण्याची भीती होती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने चिखलातील भात लागणीला वेग आला आहे. बामणोली परिसरात विविध जातीच्या भाताच्या वाणांची लागवड केली जाते. विशेषत: येथे भात खाचरांमध्ये पाणी सोडून चिखल केला जातो आणि त्यात वाढवलेल्या भात रोपांची लागण केली जाते.
दरम्यान जिल्ह्यात 1 लाख 54 हजार 238 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून त्याचे प्रमाण 48.7 टक्के आहे. जिल्ह्यात भात 19 हजार 871 हेक्टर, संकरीत ज्वारी 10 हजार 671 हेक्टर, बाजरी 20 हजार 361 हे., नागली 689 हेक्टर, मका 6 हजार 121 हेक्टर, इतर तृणधान्य 135, तूर 620, मूग 4339 हेक्टर, उडीद 834, इतर कडधान्य 8371 हेक्टर, भुईमूग 19198 हेक्टर, तीळ 64 हेक्टर, कारळा 358 हेक्टर, सूर्यफूल 51 हेक्टर, कपाशी 527 हेक्टर. उस लागण 20639 हेक्टर. अद्याप 52 टक्के क्षेत्र पेरणीपासून वंचित आहे.